गुरुवार, १६ जुलै, २०२६

दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )

 दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )


   दिन विशेष (जागतिक मातृभाषा दिन )
एकवीस फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन . एखादा दिन विशेष आला की त्या विषयावर अनेक माध्यमातून लोक आपले विचार मांडत असतात ,मी एका त्रयस्थ या दृष्टिकोनातून मातृभाषे विषयी माझे विचार मांडत आहे ,अर्थात माझी मातृभाषा मराठी असल्याने मी तिला प्रतिनिधी केले आहे . 
 माझा जन्म महाराष्ट्रात झाला (आजोळी ),आई -वडील मराठी म्हणून माझी मातृभाषा मराठी . वडिलांच्या शेती -बागायती व्यवसायामुळे बालपण ते लग्न होई पर्यंत चा काळ भवानीमंडी -भैंसोदामंडी अश्या राजस्थान -मध्यप्रदेश च्या सीमारेषेवर असणाऱ्या हिंदी भाषिक जोडगावात गेला . त्यामुळे व्यवहार भाषा कोसा कोसावर बदलणारी हिंदी भाषा ,तर शिक्षणाचे माध्यम प्रमाण हिंदीभाषा होते . गावात दोन -चार घरे मराठी होती ,त्यापैकी कुणी इंदुरी मराठी ,कुणी देशावरील तर कुणी कोकणी मराठी बोलत . आमच्या घरात आजी -आजोबा ,आई -वडील ,आत्या हे सर्व मात्र पुणे मुंबईचे प्रमाण मराठी बोलत . आम्ही पाच भावंडे ,शाळा व इतर कारणाने दहा बारा तास घराबाहेर असल्याने बरेचवेळा घरात ही आपापसात हिंदी बोलायला लागायचो . पण आई -वडील त्या बाबतीत कडक शिस्तीचे होते . घरात सर्वांनी एकमेकांशी मराठीतच बोलायचे अशी सक्तीच होतीम्हणा ना !याचा आम्हाला कधी कधी रागही यायचा . पण आज आम्ही मान्य करतो कि आई वडिलांच्या या आग्रही धोरणाचा पुढील आयुष्यात खूप फायदाच झाला . पुढे मुले मोठी झाल्यावर शेती व्यवसायात रमणार नसून ,नोकरी -व्यवसाय किंवा विवाहोत्तर आयुष्य महाराष्ट्रात घालवणार असल्याचे ,त्यांच्या दूरदृष्टीने हेरले होते . बोलीभाषे व्यतिरिक्त मातृभाषेचे ज्ञान वाढावे म्हणून वडिलांनी पुणे मुंबई निघणारे मराठी वर्तमानपत्र ही लावले होते . पोस्टाने ते दोन तीन दिवस उशीरा येत असे . पण इथे ताज्या बातम्यांपेक्षा दैनिकातील भाषा डोळ्याखालून जाणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते . मराठी—हिंदी लिपी सारखीच असल्याने फावल्या वेळेत थोडे मराठी चाळले जायचे . किंवा मोठी माणसे त्यातील कथा आणि मनोरंजनात्मक सदरे वाचून दाखवत . त्यामुळे आम्ही भावंडे कोणत्याही क्लास किंवा परिक्षे शिवाय ,आज ओघवती मराठी बोलू ,वाचू ,लिहू शकतो महाराष्ट्रा पासून दूर राहून सुद्धा ,मराठी साहित्य ,सिनेमा ,नाटक ,लेखक ,कवि यांची निदान तोंडओळख तरी झाली . त्यामुळे पुण्यात बी . एड . करताना ,मराठी माध्यम असून चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले . 
सांगायचा मुद्दा असा की जेंव्हा मातृभाषा आणि शिक्षणाची माध्यम भाषा किंवा व्यवहार भाषा वेगळी असते तेंव्हा पालकांनी तसेच कुटुंबातील मोठ्यांनी ,थोडे सक्तीने, थोडे गोडीगुलाबीने आणि थोडे वातावरण निर्मितीने मुलांना मातृभाषेची गोडी लावायला       
हवी .

   भारतात हल्ली बहुतेकांना तीन -चार भाषा अवगत असतात . मातृभाषा ,राज्यभाषा (१-२),राष्ट्रभाषा आणि अंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी . इंग्लिश आल्याशिवाय बाल्याची प्रगती होणार नाही अशी ठाम समजुत असल्याने किंवा मातृभाषेच्या चांगल्या शाळा उपलब्ध नसल्याने ,इंग्रजी माध्यम शाळेत घालण्याचे प्रमाण हल्ली खूपच वाढले आहे . दुसऱ्या बाजुला पुरेशी विध्यार्थी संख्या नसल्याने मातृभाषेतील काही शाळा बंद कराव्या लागल्या असे समजते . 
    बहुभाषिक असणे चांगलेच ,त्यातील एक मातृभाषा असावी . किमान एका भाषेवर प्रभुत्व असावे ,बाकी भाषा किमान लिहिता -वाचता—बोलता आल्या तरी चालते . मनातील भावनांचे ,विचारांचे आदान -प्रदान महत्वाचे. समोरच्याच्या भाषेत आपण संवाद साधला तर आत्मीयता वाढीस लागण्यास मदतच होते . 
    पहिली वीस -बावीस वर्षे सोडली तर ,पुढील चाळीस -पंचेचाळीस वर्षे पुण्यातच गेली . त्यामुळे तीनही मुलांना आवर्जून मराठी शाळेतच घातले . कारण मराठी मातृ-राज्य—व्यवहार भाषा होती आणि त्या वेळेस चांगल्या मराठी शाळाही उपलब्ध होत्या . पुढे मुले हिंदी ,इंग्रजी ,संस्कृत ही शिकली . मराठी माध्यमामुळे मुलांना इंजिनियरिंग च्या शिक्षणात किंवा अमेरिकेतील उच्चशिक्षण ,नोकरी ,व्यवसायात कोणतीही अडचण अली नाही . 
   आता नातवंडांच्या वेळेस त्यांना मराठी शाळेतच घालावे असा अट्टहास करणे योग्य नव्हे . स्थळ -काळ—वेळ -परिस्थिती प्रमाणे प्रत्येक प्रश्नांची उकल वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते . दूरसंचार व वाहतुकीच्या साधनांमध्ये क्रांतिकारक बदला सारख्या कारणांमुळे जगातील अंतरे कमी झाली आहेत . एका राज्यातून दुसऱ्या राज्यातच काय पण एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित होणेही सोपे झाले आहे ,त्यामुळे आंतराष्ट्रीय प्रमाण भाषेला खूप महत्व आले आहे . घरात आई -बाबा दोघांची मातृभाषा वेगवेगळी असली तर बरेच वेळा घरात इंग्लिश बोलले जाते ,तर काही वेळा फॅशन म्हणून इंग्लिश बोलले जाते . आई -बाबा दोघे नोकरी करणारे असल्याने काही मुले घरापेक्षा जास्तवेळ शाळा—पाळणाघर येथे असतात ,मग मुले जी भाषा ऐकतात तीच बोलणार नां !एक गमतीशीर किस्सा सांगावासा वाटतो -एका नोकरी करणाऱ्या मराठी कुटुंबात मुलीला सांभाळायला एक पंजाबी आया होती ,तर ती मुलगी आयांच्या सहवासामुळे आधी पंजाबी ,शाळेत जाऊ लागल्यावर इंग्रजी आणि काही वर्षानंतर थोडे मराठी बोलायला शिकली . मुलीच्या दृष्टीने विचारांची देवाण -घेवाण महत्वाची आणि नैसर्गिक ही होती .
 एकदा शिकलेली भाषा माणूस कधी पूर्ण विसरत नाही असे म्हणतात . तरी बोली भाषेत सरावाला खूप महत्व आहे . लहानपणी मी हिंदी भाषिक राज्यात राहायल्याने आधी हिंदीत विचार करून मग मराठी बोलले जायचे ,आता चार -पाच दशके महाराष्ट्रात ,तेही पुण्यनगरीत राहिल्याने ,हिंदी लिटरेचर मध्ये एम . ए . असूनही थोडे आठवून आठवून हिंदी बोलले जाते . 
   आपली संस्कृती जाणून घ्यायला मातृभाषेची खूप मदत होते . घरातील लोकांशी सुसंवाद साधणे सोपे जाते ,सुसंवादाने अनेक छोटे -मोठे प्रश्न सुटतात . त्याचा मानसिक आरोग्य चांगले ठेवायला उपयोग होतो . एखाद्या भाषे बद्दल प्रेम अवश्य असावे पण अहं किंवा न्यूनगंड नसावा . त्याचप्रमाणे इतरांच्या भाषेला कमी न लेखता तिचा आदर करणे ही आपले कर्तव्य आहे . आदर्श पिढी घडवायची असेल तर मोठ्यांनी आदर्श वर्तन करणे अपरिहार्य आहे . 
  परदेशात राहणाऱ्या माझ्या मुलांची मुले म्हणजे माझी नातवंडे मातृभाषा मराठीत संवाद साधु लागली की माझे ऊर अभिमानाने-आनंदाने भरुन येते . हे मी प्रामाणिक पणे मान्य करून ,एक पाल्य -पालक आणि आजी म्हणून आलेले अनुभव सर्व वाचकांना समर्पित करते . 
                                     आसावरी जोशी

माय मराठी राज्यभाषा दिन

 माय मराठी राज्यभाषा दिन 


उत्तमच असते माय -राज्य -राष्ट्रभाषे सोबत ,अंतराष्ट्रीय भाषेचे असणे ज्ञान ,
सशक्त संयुक्त कुटुंबात जरी एकच असतो प्रमुख ,पण इतरांनाही द्यायचा असतो योग्यतो मान -सन्मान ,
कुसुमाग्रजांना मानाचा मुजरा देऊन ,वाढली मराठीची आन -बान -शान ,
उदरात कानी पडलेल्या मायभाषेला ,सहाजिकच असते वरचे स्थान ,
भाग्यवान आपण महाराष्ट्रवासी , येथे मराठीला लाभला मातृ भाषा अन राज्य भाषा असा दुहेरी मुकुटाचा मान ,
भाषा मनीचे पोहोचविते कानी ,दोन बाजूंना जोडणारी एक लवचिक कमान ,
भाषा आपुली शास्त्रीय ,सुसंस्कृत ,समृद्ध ,पदरी आपुल्या थोर साहित्यिक -कवि -संतांचे दान ,
भाषेवरुन नको भांडण -तंटा ,ती तर एक साधन ,मोजते मनीचे उधाण ,
अभिजात ,पुरोगामी म्हणून पेलू शकते ,कालमानाने ,काही कोसाने आलेल्या योग्यत्या बदलांचे आव्हान ,
तिच्या चिर आयुष्य -आरोग्या साठी करूया ,परमेश्वराचे निःशब्द ध्यान .
       आसावरी जोशी

कोलंबस मराठी शाळेचा रौप्य मोहोत्सव

 कोलंबस मराठी शाळेचा रौप्य मोहोत्सव 

शिक्षण -नोकरी निमित्त जावे लागते साता समुद्रा पार ,
पण जात नाही मातृभूमि अन मातृभाषेचा विचार ,
पुढील पिढीचा परदेशात जात असतो बालपणी पासूनचा खूप मोठा काळ ,
पण मातृ भाषा त्यांचीही जोडून ठेवते मातृभूमीशी अन संस्कृतीशी नाळ ,
चांगलेच असते बहुभाषांचे ज्ञान ,
पण मातृभाषेला असावा सर्वोच्च मान ,
साहित्य -कला ,सणवार ,आचार -विचार प्रत्येक संस्कृतीचे महत्वाचे अंग ,
प्रत्येक संस्काराला हवाच मातृभाषेचा संग ,
अमेरिकेच्या मुक्कामात मी कोलम्बस मराठी शाळेचे जवळून पाहिले आहे उत्तम काम ,
प्रगतीच्या अफाट वारूला शाळा घालत असते सुसंस्कारांची लगाम ,
कार्यकारिणी सदस्य ,आजी माजी शिक्षक आणि विध्यार्थानांचे अभिनंदन आणि सलाम ,
रौप्यमहोत्सवा निमित्त कोलंबस मराठी शाळेला खूप खूप शुभेच्छा ,
शाळेच्या वटवृक्षाचा विस्तार वाढो अन अनेकांना संस्कारित ज्ञानाच्या 
प्राणवायु  अन शीतल छायेचा लाभ लाभो हीच ईश्वर चरणी इच्छा .
आसावरी जोशी -शुभम मुक्ताची आज्जी 

शुक्रवार, १५ मे, २०२६

Radio Sadrikaran

 रेडिओ ९०.४ सादरीकरण

मी योगासन प्राणायाम बरेच वर्ष करत होते त्या बरोबर  पार्किन्सन उपयुक्त व्यायाम प्रकार यू ट्यूब वर बघून करायला सुरुवात केली .उलटे चालणे , हाताचा  आधार न घेता खुर्ची वरून उठ बस करणे ,आवाजाचा पोत चांगला राहावा  आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरावी या साठी स्तोत्रे  मोठ्या  आवाजात म्हणणे उलटे अंक मोजणे ,रोज हाताने थोडे तरी लेखन  करणे  चालू ठेवले .स्वयं पाकात म्हणाल तर पोळी भाजी ऐवजी भाज्या घालून थालीपीठ व्हेज पुलाव  असे प्रकार  वरचे वर व्हायला लागले .बाई किंवा डबा हा पर्याय  शेवटाला .शिवण सफाईदार आले नाही तरी चालू ठेवले आहे .व्यस्त असल्यावर ट्रेमर्स चे प्रमाण थोडे कमी असते असे  अनुभवास आले .आठवड्यात  दोन दिवस मुलाकडे  जाते तेव्हा नातवा बरोबर भेंड्या  पत्ते खेळणं ,त्याला त्याला हिंदी,मराठी संस्कृत स्तोत्रे  शिकवणे चालू,भटकायला नेणे असा टाईम पास चालू  असतो .

क्षमा ताई चे पार्किन्सन वर बोलू काही  पुस्तक वाचण्यात आले त्यात पीडी सपोर्ट ग्रुप ची माहिती कळली त्यांच्या कडून मृदुला ताई आणि शोभना ताई चा नंबर  मिळाला त्यांना संपर्क साधला आणि दोनच दिवसात मी  या  ग्रुप शी जोडले गेले .
     सपोर्ट ग्रुप शी जोडली गेल्या मुळे मला एक प्रेमळ आणि अनेक पातळ्या वर आधार देणारे एक मोठे कुटुंबच  मिळाले .मनात  सकारात्मक ऊर्जेचा झरा  वाहू लागला .म्हणतात  ना “मन चंगा तो  कठो ती  मैं गंगा “
    मी  मंडळावर केलेली  एक छोटीशी कविता म्हणू  शकतें का
म्हणतात  ना उजव्या हाताने केलेले कार्य कळू नये डाव्या हाताला ,
ना अर्थाजन ना प्रसिद्धीची हाव ,खरे समाज कार्य म्हणतात याला ,
शुभार्थी -शुभंकर साठी किती तरी सभा संमेलने अन धावा धाव ,
तरी वागण्यात असतो सदा विनम्र भाव ,
येथे मिळते तज्ञा  कडून पीडी विषयीचे शास्त्रीय आणि अनुभवलेले ज्ञान ,
धोक्यांपासून सावध होता येते ,आणि आजाराच्या स्वीकृतीचे लौकर येते भान ,
शुभार्थीना  मासिक सभेतून गवसे आनंदी सकारात्मक ऊर्जा आणि संस्थे च्या मार्गदर्शनाचा वाटे मोठाआधार ,
त्या साठी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार .
          आसावरी जोशी

May flower

मे फ्लॉवर ,फायर बॉल नाव सार्थक करते ,
रंग ,आकार ,मंद -मंद सुगंध मोहिनी घालते ,
टिकाऊपणा अन नेमाने येणे जाणे असते ,
मध रसाळ गोळा करण्यासी मधुमक्षिका घोंघावते ,
वर्षातून एकदाची फुलुनी ,जन्म सार्थकी लावणे म्हणजे काय ते शिकवते ,
निसर्गाच्या किमये पुढे कर जोडुनी मी नतमस्तक होते .
आसावरी जोशी .



शनिवार, २१ मार्च, २०२६

पार्किन्सन सपोर्ट ग्रुप सदस्यांचे कार्य

म्हणतात  ना उजव्या हाताने केलेले कार्य कळू नये डाव्या हाताला ,

ना अर्थाजन ना प्रसिद्धीची हाव ,खरे समाज कार्य म्हणतात याला ,

शुभार्थी -शुभंकर साठी किती तरी सभा संमेलने अन धावा धाव ,

तरी वागण्यात असतो सदा विनम्र भाव ,

येथे मिळते पीडी विषयीचे शास्त्रीय आणि अनुभवलेले ज्ञान ,

धोक्यांपासून सावध होता येते ,आणि आजाराच्या स्वीकृतीचे लौकर येते भान ,

शुभार्थीना  मासिक सभेतून गवसे आनंदी सकारात्मक ऊर्जा आणि संस्थे च्या मार्गदर्शनाचा वाटे मोठाआधार ,

त्या साठी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार .


आसावरी जोशी 

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

शुभेच्छा पत्र -शामा च्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्त

शुभेच्छा पत्र -शामा च्या सत्तराव्या वाढदिवसा निमित्त 
अडथळ्याची शर्यत खेळत पार केलीस दशके सात ,
नोकरी ,संसार ,पुढच्या मागच्या पिढी ची जवाबदारी ,पुन्हा सात च्या आत घरात ,
बुद्धी सोबत तुझ्या नियोजनपूर्ण कष्टाला द्यावीच लागेल दाद ,
ईश कृपेने मुले निघाली संस्कारी -गुणी ,सून -जावई नातवंडं करिती प्रेमाची बरसात ,
स्वतः सोबत इतरांनाही दिलासा कायम मदतीचा हात ,
ईश्वर चरणी एकच प्रार्थना लाभो तुजसी आयु -आरोग्य-सुख-समाधान सदैव जीवनात . 
  आसावरी जोशी