गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

निष्काम कर्म

                                           निष्काम कर्म 
एकदा नदीकाठी निवांत बसले असता निसर्गाच्या निष्काम कर्मा संबंधित अनेक विचार डोक्यात येऊन गेले . नदीचा जन्मदाता पर्वत . त्याला अचल ,नग ,पाषाणाचा बनलेला असे काय काय आपण म्हणतो . मंदबुद्धी माणसाला म्हणतो ,डोक्यात काय दगड -धोंडे भरलेत ?निर्दयी माणसाला पाषाण हृदयी संबोधतो . 
      पर्वत निष्काम कर्म करतो म्हणून काय त्याच्या हृदयातील ओलावा दिसूच नये माणसाला ?घनदाट वनराई अन अनेक जीवांचा पालनकर्ता तो . पर्वताच्या पोटातूनच जीवनदायिनी नदीचा जन्म होतो . कधीही एकत्र येऊ न शकणाऱ्या दोन किनाऱ्यांना कायम सोबत घेऊन ,अविरत प्रवाहित राहणे ,हेच तिचे 'जीवन '  . नदीकाठीच अनेक महान संस्कृती जन्माला आल्या ,सुखावल्या . पाणी म्हणजे नदीचा आत्मा . त्याला 'जीवन '  ऐसे नांव . जीवाच्या जन्म -मृत्यु च्या मधील काळ म्हणजेच 'जीवन '. तसेच डोंगरातून जन्मून ,सागरात विलीन होई पर्यंतच्या प्रवासात पाण्या मुळेच नदीचे अस्तित्व असते ,म्हणून त्याला जीवन ऐसे नांव . 
         समस्त जीवांना जीवनदान देणारी नदी स्वतः कधीच पाणी पीत नाही . पण दुष्काळ समयी बिचाऱ्या नदीलाच निंदायचे !
       नदी -नाले -ओहोळ आपल्या बरोबर जेकाही वाहून आणतील -काष्ठ ,पाषाण ,पंजर ,प्लास्टिक ,त्या सर्वांना सामावुन घेणारा अथांग सागर . ओहोटी -भरती आणि इतर अनेक आंदोलने सागराच्या खाऱ्या जीवनात ,सतत सुरु असूनही ,तो आपली सीमा कधी ओलांडत नाही .  
          अथांग पाण्याचा साठा असून ,ना तहान भागवायला सागराच्या पाण्याचा उपयोग ,ना वापरण्यासाठी उपयोग ,लोकांचे असे कटु बोल पचवून सुद्धा ,इतरांसाठी सर्व खारटपणा स्वतः जवळ ठेवून ,शुद्ध गोड पाणी वाष्प रूपाने ढगांकडे पाठवणार महासागर किती महान आहेना ?
           निष्काम कर्माचा संदेश देणाऱ्या निसर्गातील सर्व गुरूंचा आपण आदर करू या ,मान राखूया . थोडेतरी त्यांचे गुण आत्मसाद करूया . निसर्गाचे संरक्षण -संवर्धनच त्यांची खरी गुरुदक्षिणा होय .

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा .

            आलोक -चाळीसाव्या वाढदिवसा निमित्त काही खास आठवणी आणि शुभेच्छा . 
                      गुरुवार दिनांक २३फेब्रुवारी १९७८हा दिवस ,माझ्या आयुष्यातील कॅलेंडर मधील ,एक सोनियाचा दिन . म्हणून कदाचित आम्ही आलोकल  लहानपणी सोनू म्हणायचो . आलोक लहानपणापासूनच शांत ,स्वावलंबी ,मोठ्यांचा मान राखणारा ,लहानांना प्रेमाने मदत करणारा ,निश्चयी ,मितभाषी पण मिष्किल ,मोजके पण जिवलग मित्र असलेला . व्यवस्थित जेऊन सुद्धा शरीरयष्टी मात्र फारच किरकोळ . अर्चना -आलोक -अनिरुद्ध ही भावंडे फारशी भांडलेली मला आठवत नाही . एक गम्मत सांगाविशी वाटते ,लहानपणी तो अंक आणि अक्षरे उलटी लिहायचा ,मिरर इमेज सारखी . तीन ला सहा आणि सहाला तीन तर हमखास . तोच प्रकार कुलुप -किल्ली च्या बाबतीत . पण प्राथमिक शाळेत पहिला -दुसरा क्रमांक सोडला नाही . कधी चारू पहिला तर कधी आलोक पहिला . 
            चिकाटी आणि हार्डवर्क च्या जोरावर बारावी बोर्डात नंबर आला आणि इंजिनिअरिंग ,एम . एस . ,पीएच . डी . असे टप्पे पूर्ण केले . पर्ड्यूला कोराफासच्या अवॉर्ड साठी नॉमिनेशन झाले तेव्हा आणि पीएच . डी . ग्रॅज्युएशन सेरेमनी चा वॉक पाहताना अभिमानाने ऊर भरून आले . पुढे नोकरी ,लग्न ,बाबा म्हणून ही प्रमोशन मिळाले . 
            आता आलोक -अनन्या -अर्चित पुण्यात आल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झालाय . 
 चाळीशी म्हणजे काय ?जणु अठरा वर्षाच्या सज्ञान -सतेज रत्नाला बावीस वर्षाच्या स्वानुभवाचे कोंदण लाभावे ,
  आमच्या शुभेच्छा आणि परमेश्वराचे आशिर्वाद सदा तुझ्या ,पाठीशी असावे . 
                                                                                                           Aai