मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

प्रार्थना -त्वमेव माताच पिता त्वमेव .....

          प्रार्थना -त्वमेव माताच पिता त्वमेव ..... 
तूच माता तूच पिता ,बंधू -भगिनी मित्र ,
विद्या ,कला ,पैसा अडका ,सुख समृद्धी ,तुजविण सारे शून्यमात्र ,
तूच जीवन ,एका मडक्याला बनवीशी ,पूज्य कलश अन अभिषेकाचे पात्र ,
धरणी ,वायु ,आकाश ,अग्नी ,पंचतत्वाना बांधुन ठेवणारे  तू सूत्र ,
“पिंडी ते ब्रह्मांडी ,ब्रह्मांडी ते पिंडी ,होई निर्मिती सृष्टीची ,या तत्वांच्या असण्याने एकत्र ,
तूच पंचप्राण ,कर्ता -धर्ता-हर्ता ,भूलोकी सर्वत्र ,
ना थकशी ना कंटाळशी ,कसेरे फिरवितोस ,नचुकता जीवनचक्र अन दिवा -रातीचे सत्र ,
परमेश्वरा दे मजसी दे शक्ती बुद्धी तव स्मरणाची ,अंतर्मनातुनि अहोरात्र .

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

अष्टांगयोगातील एक शुद्धिक्रिया -जलनेती

         अष्टांगयोगातील एक शुद्धिक्रिया -जलनेती 
मी योगप्रवेश >परिचय >शिक्षक हा अभ्यासक्रम नाशिकच्या योगविद्याधाम येथे २००४ मध्ये एक महिन्याच्या निवासी शिबिराद्वारे पूर्ण केला . शास्त्रीय पण सोप्या पद्धतीने अष्टांग योग शिकवल्या बद्दल सर्व गुरुजनांचे आभार . त्या नंतर ही वेळोवेळी निरामय जीवनाला पूरक असे छोटे छोटे कोर्स केले . इगतपुरीला  राहून ‘विपश्यना ’चे प्राथमिक शिक्षण घेतले . आयुष्याच्या आत्ता पर्यंत च्या प्रवासात ज्यांनी ज्यांनी कळत न कळत मला सुज्ञान ,संस्कारक्षम ,साकारात्मकतावादी ,सक्षम बनवण्यासाठी हातभार लावला त्या सर्वांचे अन जन्मदात्या मातापित्यांचे आभार . पंचतत्वांनी व्यापलेल्या निसर्गरूपी गुरु चे आभार . मनुष्य जन्म देऊन आज पर्यंत जे सुख -समाधान दिले त्या परमोच्च गुरुदेव परमेश्वराचे आभार आणि सर्वांना शतशः नमन . 
        अष्टांगयोगातील यम ,नियम ,आसन ,प्राणायाम म्हणजे बहिरंगयोग . धारणा ,ध्यान ,समाधी हा अंतरंगयोग . बहिरंग  आणि अंतरंग ला जोडणारा दुवा म्हणजे प्रत्याहार . बहिरंग शरीराला अंतः -बाह्य शुद्ध ठेवायला व निग्रही, समतोल साधणे ,सकारात्मकता शारीरिक आरोग्य चांगले कसे ठेवायचे हे शिकवतात . अंतरंग मन आणि आत्म्याला निरोगी कसे ठेवता येईल हे शिकवतात . अश्या प्रकारे शरीर -मन-आत्म्याचा सुंदर योग जुळून आला की निरामय जीवन जगण्यास मदत होते . योगशास्त्राकडे उपचार पद्धती म्हणून न पहाता ,जीवनशैली म्हणून बघणे उचित ठरेल . 
         प्रत्येक व्यक्तीने या जीवनशैलीचे अनुकरण केले तर कुटुंब ,समाज ,राष्ट्र आणि ओघाने समस्त सृष्टी निरोगी ठेवण्यास मदत होईल . 
     संपूर्ण आरोग्यासाठी सामान्यतः योग्य आहार ,व्यायाम ,विश्रान्ती सोबत एका आध्यात्मिक बैठकीची गरज असते . आपण नशीबवान आहोत कि आपल्या संस्कृतीला ही बैठक वेद ,पुराण ,आयुर्वेद ,योगशास्त्र ,रामायण ,महाभारत ,गीता अश्या अनेक अमूल्य ग्रंथातून ,ऋषीमुनी ,संतमहंतांच्या विचारधारेतून वारसाहक्काने मिळाली आहे . त्यावरील धूळ झटकून गाभ्याचा अंगीकार ,संवर्धन ,जतन ,प्रसार करायला हवा . तर्कशास्त्राच्या मदतीने एका पिढीने पुढच्या पिढी पर्यंत या संपत्तीचे हस्तांतरण करीत राहिले पाहिजे . आपली प्राचीन शास्त्रे स्थल -काल अबाधित आहेत . जीवनशैली म्हंटले कि वैयक्तिक पातळीवर दैनिक ,नैमित्तिक ,प्रासंगिक लवचिकतेचे भान ही असायला हवे . 
    महामुनि पतंजलींना नमन करून मी  योगशास्त्रातील जलनेती या शुध्दीक्रियेचे छोटे प्रात्यक्षिक प्रस्तुत करीत आहे .अनेक तज्ज्ञांनी याची महती सांगितलीच आहे . पण सध्या महामारी जन्य परिस्थितीत ,किमान रोज सकाळी एकदा जलनेती केल्याने मला आणि अनेकांना फायदा होत आहे . मी २००ml पिण्याच्या कोमट पाण्यात चिमुटभर मीठ घालुन एका नाकपुडी साठी वापर करते . पुन्हा तशीच क्रिया दुसऱ्या नाकपुडी साठी करते . जलनेती करण्यापूर्वी आधी ५-१०वेळा कपालभाती करून नासिका मार्ग स्वच्छ करून घेणे जी नाकपुडी (नाडी )चांगली चालत असेल त्या बाजुने सुरुवात करावी . पुन्हा २००ml पाणी घेऊन दुसऱ्या बाजुने ही क्रिया करावी . किंवा कम्फरटेबल वाटेल त्या बाजूने आधी केली तरी हरकत नाही . जलनेती करताना नाकाने श्वास घेऊ नये . तोंड उघडे ठेऊन सहज श्वास घेत रहावे . नेती पूर्ण झाल्यावर पुन्हा ५-१०वेळा कपालभाती करावी . नाकासमोर पाणी टिपण्या साठी एक स्वच्छ रुमाल धरावा . घश्यात पाणी गेले तरी काळजी नसावी . खाकरून टाकावे . डोक्याच्या बाजूला थोडे पाणी गेले असे वाटल्यास ,कपाळावर पुढे ,डावीकडे ,उजवीकडे थपकी मारावी . धन्यवाद !!!
                                      आसावरी जोशी

परिस्तिथी जन्य गुरु कोविड १९/ कोरोना

         परिस्तिथी जन्य गुरु  कोविड १९/ कोरोना 
एका परावलंबी शूद्र व्हायरस ने  संपूर्ण मानव जातीची  चांगलीच आवळली मान ,
त्याच्या लेखी सर्व देश -जाती-धर्म -रंग-श्रीमंत-गरीब-शिक्षित-अशिक्षित ,समानच ,ना कोणी मोठा ना कोणी लहान ,
स्वावलंबन ,स्वच्छता ,स्वयंशिस्त ,काटकसर, कष्ट याचे कोरोना नामक गुरूने उजळणी रूपात शिकवले  ज्ञान ,
वर्ष भरात आले काय नि गेले काय ,कित्येक  कार्ये ,उत्सव ,समारंभ ,सण ,वार ,
सनई ,ढोल ,ताशे ,घंटा ,टाळ अश्या ऊर्जा देणाऱ्या नादाऐवजी ,ऍम्ब्युलन्स  च्या आवाजाने केले बेजार ,
उलटी गंगा वाहू लागली ,काय म्हणावे या कलियुगाला !!!
पूर्वी पालक म्हणत बालकाला “ठेव तो मोबाईल अन बस अभ्यासाला ”
आता -“घे तो मोबाईल अन बस अभ्यासाला ”असे आईच सांगे मुलाला ,
आप्त मित्रांपासून दोन हात दूरच राहणे म्हणजे होते तुसडे पणाचे लक्षण ,
सध्या तेच वागणे म्हणजे झालाय सभ्य शहाण्या माणसाचा एक गुण ,
सुख दुःखात माणसाने माणुसकी जपत कायम माणसा सोबत असावे ,
महामारीने शिकवले आजारी माणसा पासून दोन मीटर दूरच रहावे ,
बुद्धीच्या जोरावर मानवाने निसर्गावर केली मात , नियमांपेक्षा वरचढ झाले नियमांना पुष्टी देणारे अपवाद 
स्वरक्षणा साठी पंचतत्व युक्त पुरूष -प्रकृतीला नाईलाजाने उचलावा लागत आहे हात ,
मानव -निसर्ग ,मन -शरीर ,नवे -जुने ,बुद्धी -भावना  मानवता -भौतिकवाद ,सर्वातच साधुया समतोल ,
“अति तेथे माती “शेवटी सुवर्ण मध्यच ठरत असतो अनमोल 
आपल्याकडे बाहेरून आल्यावर अन जेवणा पुर्वी हातपाय धुणे हा रक्तातच रुजला होता संस्कार ,
“बिग हग पेक्षा प्रेमाने सुहास्य बघ “ची होती शिकवण ,शेकहॅंड पेक्षा करतच  होतो ना नम्रतेने नमस्कार ,
जन्म मृत्यू समयी सोयर सुतक म्हणजे आजच्या क्वारंटाईन चाच होता एक प्रकार ,
रूढी परंपरांचा बडगा नको ,पण समजून घ्यायला हवा त्या मागचा शास्त्रीय आधार ,
“वाचाल तर वाचाल “खरे असले तरी सध्या  अनलिमिटेड  कॉलिंग वाट्सअँप ,ट्विट वाचन ,कळेना शाप कि वरदान !!!
शेवटी साधन होऊ नये साध्य याचे आपणच ठेवायचे असते भान ,
दो गजकी दूरी ठेवताना ,जमेची बाजू म्हणजे सोशल मीडिया मुळे भावनांचा निचरा करता आल्याने पेलता आले अवघड आव्हान 
सर्वोच बुद्धिमान सामाजिक प्राणी ,पैसे -सत्ता -शक्ती असूनही झाला असहाय ,ताका ने भागवावी लागली दुधाची तहान ,
जुनं ते सर्वच सोनं नसेलही ,पण पाश्चात्यांचे अंधानुकरण हा एकमेव नसावा सर्वोत्तम उपचार ,
संकटे येतात तशी जातातही ,त्यांना संधी समजू या अन डॉक्टर ,पोलिस स्वच्छता कर्मचारी ,सर्व समाज सेवकांचे मानूया आभार 
काळजी करूया नकोत ,काळजी घेऊ या आपली अन इतरांची , करुयात बंदिवासाचा  सदुपयोग अन सकारात्मक विचार ,
शुद्ध निरिच्छ सेवाभाव ,हीच तर खरी विरक्ती -श्रद्धा-भक्ती अन ईश्वरीय साक्षातकार ,
देवा महामारीच्या विळख्यातून लवकर सोडव मानवास ,दे विश्व् बंधुत्व भाव जपण्याची सदबुद्धी , तव चरणी शतशः नमस्कार !!!
                                                                             आसावरी जोशी