गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४

क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली .

 क्षण कसोटीचे -श्रद्धा होतीच ती अजून दृढ झाली . 


   काही कारणाने एक जुनी आठवण ताजी झाली . साधारण  पंधरा वर्षा पूर्वीचा प्रसंग आहे ,मी आमच्या शेजारच्या देवगांवकर कुटुंबियांसोबत गुजरात -सौराष्ट्र च्या ट्रिपला गेले होते . आम्ही आठ लोक होतो . अहमदाबाद ,डाकोर ,द्वारका ,सोमनाथ ,राजकोट ,पोरबंदर ,जूनागढ गिरनार अश्या बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो . गिरनारला "श्री गुरुदत्त शिखर "चढायचे असेल तर दहा हजार पायऱ्या चढाव्या लागतात . गुरुदेवदत्त आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने एक दिवस आम्ही गिरनार दर्शना साठी राखून ठेवला होता  कारण तेंव्हा रोपरेल ची  सोय  नव्हती आता  निम्या पर्यंत  रोप रेल  ची  सोय  झाली आहे . रात्री हॉटेल मध्ये मुक्काम करून सकाळी लवकर गिरनार वर जायचे ठरले . काही लोक डोलीने गेले ,एकांनी हॉटेलवर थांबणे पसंत केले . आम्ही तीन लोकांनी पायऱ्या चढून जायचे ठरवले . काहीना काही कारणाने आम्हाला चढणे सुरु करायला थोडा उशीरच झाला . सकाळी दहा च्या आसपास आम्ही चढायला सुरुवात केली . चालणाऱ्यांची आणि डोली वाल्यांची बऱ्यापैकी वर्दळ होती . शिखरावर जाताना वाटेत अनेक देवळांचे दर्शन घेत गेलो . उदा . जैन मंदिर ,अंबामाता ,मच्छिन्द्रनाथ ,गोरखनाथ इत्यादी . सर्वोच्च शिखरावर "श्री गुरु दत्तात्रेयांचे "जागृत देवस्थान आहे . शिखरावर दत्ताचा पादुका आणि मूर्तीची मनोभावे पूजा केली शांतपणे दर्शन घेतले . दहा हजार पायऱ्या चढून गेल्याचा थकवा जणु पळून गेला . जागृत देवस्थान म्हणजे काय याचा खरा अर्थ कळला . परतीचा प्रवास सुरु करणार तर समजले कि थोडेसे उतरून पुन्हा थोडे चढले की तेथे अखंड धुनी आणि प्रसादाचे जेवण मिळते . धुनीचे दर्शन आणि प्रसादा शिवाय परतणे मनाला पटले नाही . आम्ही तेथेही गेलो . मन तृप्त झाले . आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली

उतरणाऱ्या लोकांची वर्दळ हळू हळू कमी व्हायला लागली होती . डोलीवाले सरावा मुळे भराभर उतरत होते . आम्हीपण उतरताना जलद गतीने उतरत होतो . पण पाय थकले होते आणि उतारावर तोल सांभाळणे अवघड जात होते . अश्या वेळेस काठीचा चांगला उपयोग झाला . तरी जाताना लागला त्यापेक्षा निम्म्या वेळेत नऊ हजाराच्या वर पायऱ्या उतरून आलो होतो . दिवस लहान असल्याने लवकर अंधार झाला . पायऱ्या दिसेनाश्या झाल्या . आजूबाजूच्या झाडातून सरसर आवाज ऐकू येऊ लागले . पायऱ्यांचे दगड गुळगुळीत झालेले ,पायताणे पण झिजलेली ,दोन-तीन वेळा पडता पडता राहिलो . आमची गती खूपच मंदावली होती . आम्ही ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ वयोगटातील होतो . मनात एक अनामिक भिती होती . आमच्या तिघांशिवाय आता कोणीच यात्रेकरू दिसत नव्हते . प्रवासाच्या तयारीत घेतलेली बॅटरी हॉटेल वर राहिली होती ,मोबाईल मधील टॉर्च वापरायचे डोक्यातच आले  नाही .  सहकाऱ्यांना फोन करावा तर फोनला रेंज मिळत नव्हती . तेवढ्यात महाविद्यालयीन मुला -मुलींचा एक ग्रुप आम्हाला वर चढताना दिसला . काय करावे कळेना ,या मुलांकडे मदत मागावी का ?ते मदत करतील का ?अश्या अनेक शंका मनात आल्या ,पण दुसरा    काहीच पर्याय नसल्याने त्यांना भैया म्हणून हाकमारले आणि आमची अडचण त्यांना सांगितली . ते म्हणाले आम्ही खाली हॉटेलमध्ये  उतरलोय ,जेवायला थोडा वेळ होता म्हणून विचार केला थोडे  फिरून यावे कारण सकाळी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत . आम्ही त्यांना विनंती केली कि पायथ्या पर्यंत उतरायला आमच्या सोबत येता का ?ती मुले क्षणाचाही वेळ न लावता लगेच तयार झाली . जणू त्या साठीच ते सगळे तिकडे आले होते . एकेकाने आमच्या पैकी प्रत्येकाचा हात धरला बाकीच्यांनी सेलफोन ची बॅटरी सुरु केली आणि म्हणाले ,आम्ही तुम्हाला तुमच्या हॉटेल पर्यंत सोडल्या शिवाय जाणार नाही . बोलता बोलता पायथा केव्हा आला ते कळलेच नाही . आमचा ग्रुप आमची वाट पहात पायथ्याशी थांबला होता . 
       गिरनार च्या शिखरावर पाषाणात दत्ताचे दर्शन झाले आणि पायथ्याशी आल्यावर त्या तरुण मुला -मुलींच्या रूपानेच जणू देव भेटल्याची प्रचिती आली .
                                                     आसावरी जोशी 
                                                       मो. ९६८९३९०८०२

                वयाचे  टप्पे 

बालपण देगा देवा ,ठेवा जपून आनंदाचा ”ठेवा ”
सोळावे वरीस  ,गद्धे पंचविशी  चे अडथळे पार करीत ,सोनेरी स्वनांचा तारुण्याचा काळ सर्वाना वाटे हवा हवा ,
पुढे जोडीदाराच्या मदतीने संसाराचा गाडा ओढण्याची असते मोठी जवाबदारी ,
मुलांचे शिक्षण -आरोग्य -लग्न-स्वावलंबन यात आव्हाने येतात कितीतरी ,
सोबत आई -वडील परिजनांची काळजी ,अन नाती जपण्याची कसरत ,जणू चालणे तारेवरी ,
बांधावा लागतो लवचिक पूल ,पुढच्या -मागच्या पिढीची सांधायला दरी ,
हेसगळे करताना उभयतांच्या उतरणीच्या नियोजनाची ही घ्यायची असते खबरदारी . 
साठी -सत्तरीच्या मधे सुरु होते आयुष्याची उतरणी ,
तुलनेने थकते शरीर ,साठी बुद्धि नाठी सारख्या चिकटतात म्हणी ,
हा काळ होतो सुसह्य ,जर जपले असेल तन -मन-धनाचे आरोग्य तरुणपणी ,
म्हातारपण -बालपणात साम्य असते ,ही भावना सकारात्मकता दर्शविणारी ,
बालके बोट धरून चालणारी ,एकच प्रश्न अनेक वेळा विचारणारी ,
उतरणीतही तेच असते ,फरक एवढाच एक कृती आनंद देणारी तर दुसरी वैताग देणारी ,
म्हातारपण -बालपण जणू चंद्राची कोर ,कृष्ण -शुक्ल दोन्ही पक्षात दिसणारी ,
एक कोर वाढत वाढत पूर्ण चंद्राच्या रूपाने शीतल प्रकाश देणारी ,
तर दुसऱ्या पक्षातील कमी कमी होत ,कोर रूपाने अंधारात विलीन होणारी ,
पण अमावस्येच्या अस्तित्वा मुळेच पौर्णिमा येते लखलखणारी ,प्रकाशाच्या वाटा दाखवणारी ,
देवा जेष्ठांच्या अनुभवाची शिदोरी ठरू दे समाज -संस्कृतीला  पोषक अन समृद्ध करणारी .
          आसावरी जोशी 
     मो. ९६८९३९०८०२






बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

प्रकाश बापट पंचाहत्तरी -अमृत महोत्सव समारंभ

प्रकाश बापट पंचाहत्तरी -अमृत महोत्सव समारंभ 
उगविला सोनियाचा दिन ,आपणास पंचाहत्तरी निमित्त खूप खूप शुभेच्छा श्री चरणी जोडोनिया कर 
मनाली -सचिन ,अनन्या -आलोक ,अनिशा -अर्चित यांनी प्रेमाने वाढदिवसा निमित्त रचला बेत सुंदर ,
आप्त -मित्र-कट्टा जन अमृताचा शिम्पडिती सडा शातायुषी प्रवासाच्या वाटेवर ,
सामान्य माणसाचा आपल्या हातून थोडे घडावे परमार्थ यावर ही असतो भर ,
ग्राहक पंचायती  सारख्या समाज कार्यात आपला खारीचा वाटा दिसून येतो एक नंबर ,
अंबे जोगाई -दुर्गा व्याडेश्वर कृपेने आपणांसी लाभो भरपूर आरोग्य आनंद सुख समाधान आयुष्यभर . 
          आसावरी जोशी