सोमवार, २५ जुलै, २०१६

वयाचे टप्पे -उतरणी



वयाचे टप्पे -उतरणी 
साठी -सत्तरीच्या मधे सुरु होते आयुष्याची उतरणी ,
तुलनेने थकते शरीर ,साठी बुद्धि नाठी सारख्या चिकटतात म्हणी ,
हा काळ होतो सुसह्य ,जर जपले असेल तन -मन-धनाचे आरोग्य तरुणपणी ,
म्हातारपण -बालपणात साम्य असते ,ही भावना सकारात्मकता दर्शविणारी ,
बालके बोट धरून चालणारी ,एकच प्रश्न अनेक वेळा विचारणारी ,
उतरणीतही तेच असते ,फरक एवढाच एक कृती आनंद देणारी तर दुसरी वैताग देणारी ,
म्हातारपण -बालपण जणू चंद्राची कोर ,कृष्ण -शुक्ल दोन्ही पक्षात दिसणारी ,
एक कोर वाढत वाढत पूर्ण चंद्राच्या रूपाने शीतल प्रकाश देणारी ,
तर दुसऱ्या पक्षातील कमी कमी होत ,कोर रूपाने अंधारात विलीन होणारी ,
पण अमावस्येच्या अस्तित्वा मुळेच पौर्णिमा येते लखलखणारी ,प्रकाशाच्या वाटा दाखवणारी . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा